

नेरळ : माथेरानमध्ये लहान शिशुना संस्काराचे शिक्षण देणाऱ्या अंगणवाडीच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच जमा केल्या असून नगरपालिका प्रशासनाकडून या कडे डोळे झाक केली जात आहे. याला लागूनच ज्यांनी देशासाठी बलिदान देऊन हौतात्म्य स्वीकारले ते हुतात्मा स्मारक याला लागूनच आहे.या विदारक चित्रामुळे हुतात्म्यांचे देखील भान नगरपालिकेला राहिले नाही का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेे.
माथेरान रेल्वे स्थानकापासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर ,ई-रिक्षा चार्जिंग स्टेशनला लागूनच बिअर आणि दारूच्या बाटल्यांचा ढीग पहावयास मिळत आहे. समाज कल्याण विभागाची अंगणवाडी असून या अंगणवाडी 30 पेक्षा जास्त शिशु बालके संस्कार रुपी शिक्षण घेत आहेत.याला लागूनच कम्युनिटी सेंटर असून अनेक सामाजिक कार्यक्रम तसेच शासकीय कार्यक्रम होत असतात.याच आवारात अंगणवाडी पासून फक्त दहा फूट अंतरावर दारूच्या बाटल्यांचा ढीग पडलेला आहे.
गोणी भरून या बाटल्या इथे टाकल्या आहेत . तळीरामांचा अड्डा असल्यासारखे येथे बाटल्या सर्वत्र विखुरलेल्या पडलेल्या आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी या आवारात सतत वावरत असतात.असं असताना पालिका याकडे दुर्लक्ष का करतात?या विखुरलेल्या बाटल्या नक्की कोणी इथे टाकल्या?यामधून या चिमुकल्याच्या मनावर काय परिणाम होईल?असे अनेक प्रश्न स्थानिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहेत. या तळीरामानी हुतात्म्यांच्या बलिदानाची चिंता देखील केली नाही.हा पूर्ण प्लॉट हा नगरपालिकेचा असून पालिकेने लाखो रुपये खर्च करून चहू बाजूने संरक्षक कठडे बांधले आहेत.हे कठडे तोडून या बाटल्या या आवारात फेकल्या आहेत. याबाबत पालिका अनभिज्ञ कशी? पालिकेला याबाबत कोणतीही माहिती नाही? अशा संतप्त प्रश्नानी पालिकेवर स्थानिकांकडून तीव्र नाराजी प्रकट केली जात आहे.
या दारूच्या बाटल्या एकदोन दिवसात टाकल्या नसून हळूहळू टाकून कित्येक वर्षांनी याचा ढीग तयार झाला आहे.मात्र याकडे पालिकेने स्पष्ट दुर्लक्ष केले आहे.आतातरी पालिका जागी होऊन बाटल्या टाकणाऱ्यावर कडक कारवाईचे धाडस दाखवणार का?असा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.