महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा, सामाजिक समरसतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी रथ यात्रा : स्नेहल जगताप
Mahad NCP Rath Yatra
महाड : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण राज्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले, त्यांचे स्मरण म्हणून या यात्रेचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील सिंधुदुर्ग पासून सुरू केले आहे. 1 मे रोजी मुंबईमध्ये या रथयात्रेचा सांगता सोहळा होणार आहे. राज्याचा वैभवशाली इतिहासाचा, सामाजिक समरसतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही रथयात्रा असल्याचे मत महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी पोलादपूर महाडमध्ये या यात्रेचे स्वागत करताना व्यक्त केले.
महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाले. या नंतर महाडकडे आगमन व स्वागत करण्यात आले. महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. या नंतर चवदार तळे येथील पाणी मंगल कलशात घेत पूजन करण्यात आले.
चवदार तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्नेहल जगताप यांच्या समवेत सुभाष निकम, खेडेकर, अजय सलागरे, धनंजय देशमुख, निलेश महाडिक, निलेश पार्टे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल कलशमध्ये महाडमधील हुतात्मा स्मारक परिसरातील माती तसेच किल्ले रायगडावरील जल व मृदा तसेच गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूंची माती, नद्यांचे पाणी एकत्रित करण्यात येणार आहे. किल्ले रायगडवरील मातीसह चवदार तळे येथील पाणी या सजविलेल्या मंगल कलशातून मुंबई येथे रवाना झाले.
धार्मिक उत्सवाबरोबरच भक्तीच्या संगमातून संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून या मंगल कलश रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्नेहल जगताप यांनी बोलताना दिली.
महाडमधील कार्यक्रमादरम्यान सर्वश्री श्रेयश जगताप, मोहन काका शेठ, सुदेश कलमकर, साहिल हेलेकर देशमुख, बाळा सकपाळ, पप्पू शेठ, निकम रोहित पोरे यांसह श्रीमती स्मिताली यादव सौ पूजा गोविलकर सौ अस्मिता शिंदे आधी महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.

