

महाड: महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीत विषारी वायुगळती होऊन दोघांचा मृत्यू, तर सुमारे ६० जण बाधित झाल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेच्या वेळी कंपनीत जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळेच परिस्थिती गंभीर बनल्याचा संताप व्यक्त होत आहे.
शनिवारी दुपारच्या शिफ्टमध्ये इंडो अमाईन्समध्ये २६ कामगार उपस्थित होते. त्यापैकी तिघांना वायुगळतीची बाधा झाली. त्यातील एकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये इंडो अमाईन्समधील अमित राज आणि विरल कंपनीतील अल्पेश वांद्रे (रा. बोरगाव, ता. महाड) यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, वायुगळतीच्या वेळी कंपनीत जबाबदार अधिकारी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीसमोरील विनती ऑरगॅनिकमधील सुरक्षा अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्या लागल्याची माहिती महाडचे माजी उपसभापती चंद्रकांत बुवा जाधव यांनी दिली.
एवढी गंभीर दुर्घटना घडूनही कंपनीत जबाबदार अधिकारी उपस्थित नसणे हा संतापजनक प्रकार असून, औद्योगिक सुरक्षेचे नियम नेमके कितपत पाळले जातात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.