

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात सद्या काजुच्या बियांना मोठया प्रमाणात मागणी असून कोकण मार्गावर खाडीपट्टयात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजुला आदीवासी बांधव, भगिनी काजूच्या बिया विकताना पहायला मिळत आहेत.
काजूच्या बिया विकून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी या बांधवांची धडपड सुरू आहे. खाडीपट्टयातील तुडील फाटा, जुई, रोहन फाटा, रत्नागिरीतील म्हाप्रळ फाटा येथे आदिवासी बांधव, भगिनी काजूच्या सोळलेल्या बिया विकत आहेत आणि त्या बियांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. काजूच्या बियांना खाद्यामध्ये मोठी पसंती असून जेवणाच्या रस्स्यामध्ये काजूच्या बिया म्हणजे जेवणाची चव वेगळीच असते. सद्या एक-दिड महिन्याच्या कालावधीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या महाड खाडीपट्टयाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी आदिवासी बांधव, भगिनी काजूच्या बिया विकत असल्याचे पाहायला मिळत आहे. काजूच्या बिया घेऊन या महिला वर्ग महाड-म्हाप्रळ रस्त्यावरील रोहन फाटा, जुई, म्हाप्रळ फाटा आदी ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
कोकणात सद्या काजुच्या बियांना मोठया प्रमाणात मागणी आहे. कोकणचा निसर्ग पर्यटनाबरोबरच येथील आंबा, फणस, काजू या फळांना देखील जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कोकणचा आंबा तर सर्व जगात फेमस आहे. त्याचबरोबर काजुच्या बियांना देखील मोठया प्रमाणात मागणी आहे. कोकणात नारळ, सुपारी तसेच आंबा, फणस आणि काजूच्या बागा सर्वत्र पाहायला मिळतात. सध्या कोकणात काजूचा हंगाम सुरू असून तालुक्यातील खाडीपट्टयात राष्ट्रीय महामार्गावरील तुडील, जुई, कुंबळे, रावढळ तसेच म्हाप्रळ फाटा या ठिकाणी दररोज आदिवासी बांधव, भगिनी काजूच्या बिया फोडून त्या 350 ते 400 रूपये शेकडा प्रमाणे करण्यात मग्न पाहायला मिळतात. त्यांना विचारले असता दररोज मोठ्या शिमगोत्सवासाठी येणारे मुंबईकर तसेच स्थानिक नागरिक खरेदी करतात मोठया काजूच्या बिया खरेदी करत आहेत.
दरम्यान, विटभट्टी वरील कामे देखील सुरू असून फावल्या वेळात आणखी संसाराला जोड मिळावी म्हणून येथील आदीवासी भागिनी या कामाकडे वळले आहेत. काजूच्या बियांची साळ काढल्यानंतर शेकडा 350 रूपये, तर साळ न काढता 300 रूपये शेकडा दराप्रमाणे काजूच्या बिया विकत आहेत. काजूच्या बियांची साळ काढणे मोठे जिकरीचे काम असून बिया फोडताना बियांमधून अंगावर उडणारा चिक अंग काळे करून टाकते.
आदिवासी बांधव शेती, बागा साफ, स्वच्छ ठेवण्यासाठी राखणीला कामाला असतात. कित्येक ठिकाणी तेथील राखण करताना काजूच्या झाडांची राखण ही त्यांच्या देखरेखेखाली होत असल्याने निम्मा हिस्सा हा राखण कर्ता आदिवासी बांधव ठरवून घेतात. त्यामूळे काजूच्या बिया विकून उदरनिर्वाह करणे आता या आदिवासी बांधवांचे जीवन बनले आहे. दिवसभर काबड कष्ट आणि रात्री भेटेल तेथे निवारा असा या समाजाचा विंचवासारखा बिऱ्हाड आहे. मात्र स्वाभिमान बाळगत कष्टाने घाम गाळून प्रचंड मेहनतीने काम करत आपला संसार हाकत आहेत. मात्र कष्टाप्रमाणे मोबदला मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करत आहेत.