

कर्जत: कर्जत रेल्वे स्थानकात कोरोना पूर्वीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा थांबविल्या जाव्यात, सनदशीर मार्गाने आंदोलन करून ही समस्या सुटणार नसेल तर रेल रोको आंदोलन करावे लागेल,असा इशारा कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समितीच्या वतीने देण्यात आला.रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी कर्जतच्या श्री शनि मंदिराच्या रविकिरण सभागृहात कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समितीने विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
समितीचे प्रमुख ॲड. कैलास मोरे, प्रवीण गांगल, सतीश मुसळे, प्रशांत उगले, सुरेश खानविलकर, मोहन ओसवाल, प्रभाकर करंजकर, राजाभाऊ कोठारी, विकास चित्ते, रमेश कदम, राहुल खोपकर, ॲड. योगेश देशमुख, ॲड. रवींद्र गायकवाड, ॲड. महेश घारे आदी उपस्थित होते. सुरुवातीला ॲड. मोरे यांनी बैठकीचा उद्देश जाहीर केला.
प्रभाकर करंजकर यांनी आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र हल्ली कोणतीच समस्या सुटत नाही. असे चित्र दिसते. त्यामुळे कोणतेही आंदोलन करायचे असेल तर मी सर्वात पुढे असेन असे सुतोवाच केले.
कीर्ती शहासने यांनी, सकाळी सात वाजता मुंबईकडे जाणारी लोकल कधीच वेळेवर येत नाही. ती येतानाच दहा-पंधरा मिनिटे उशिरा येते. तसेच रेल्वे स्थानकावर पोलीस उपस्थित नसल्याने महिलांना भिकऱ्यांचा खूप त्रास होतो. हवी तशी स्वच्छता नाही. फलाटाच्या मध्यभागी एखादा पदचारी पूल असावा असे सूचित केले.
मोहन ओसवाल यांनी, आपल्याला पुढाऱ्यांचा काही उपयोग होत नाही. कोणत्याही समस्या सुटत नाहीत. आमच्या सारख्या वयस्कर माणसाला बदलापूर स्थानकावर उतरण्याची सोय नाही. रेल रोकोसाठी आम्ही कधीही तयार आहोत. असे सांगितले. प्रवीण गांगल यांनी साध्या आंदोलनांचा काही उपयोग नाही. त्यासाठी रेल रोकोच योग्य राहील.
असे ठामपणे सांगितले. रमेश कदम यांनी, रेल्वे समस्या सुटण्यासाठी उपोषण करण्यास माझी तयारी आहे. रेल्वे रुळावर जरी आंदोलन करायला लागले तरी आमची पोलीस मित्र संघटना मागे हटणार नाही. असे स्पष्ट केले. सुरेश खानविलकर यांनी सुद्धा आंदोलन करण्या शिवाय पर्याय नाही. असे सूचित केले. विलास सांगळे, विजय गोखले, संजय अभंगे, राहुल खोपकर, श्रीकांत गायकवाड, तनुजा गायकर आदींनी समस्या सांगितल्या.
शेवटी ॲड. मोरे यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुढील रविवारी 12 एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेण्यात येईल. असे जाहीर केले. याप्रसंगी कृष्णा जाधव, मालू निरगुडे, सचिन गायकवाड, विजय बेडेकर, अंकित ओसवाल, हिम्मतराज जैन, मुकेश पाटील, प्रणेश यादव, अमोल भोपतराव, गणेश जंगम, मयुरी मुसळे, इनायत परदेशी आदी कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी पाठपुरावा नेहमीच करीत असतो. आपल्या अनेक समस्या आहेत. सभेच्या वेळी मी त्या पोटतिडकीने मांडत असतो. अगदी खासदार श्रीरंग बारणे यांनाही मी भेटलो असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा भेट घेऊन गाड्यांना थांबा द्यावा यासाठी साकडे घातले आहे. जोधपूर हडपसर गाडी कर्जतला थांबावी. यासाठीही प्रयत्न करीत आहे. तुम्ही कधीही आंदोलन करा. मी तुमच्या बरोबर आहे.
- नितीन परमार, रेल्वे समितीचे सदस्य