

रायगड ः रायगडात जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकच भाऊगर्दीझाल्याचे दिसून आले.सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करुन दाखल केल्याने रायगडच्या राजकीयआखाड्यात पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु झाल्याचे दिसून आले. सर्वच मतदार संघांमध्ये बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.
रायगड जि.प.च्या 59 गटांसाठी तर 15 पंचायत समित्यांच्या 118 गणांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे.यासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. बुधवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठीउमेदवारांची झुंबड उडाली होती.यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
भाजप, काँग्रेस, शेकाप, दोन्हीशिवसेना,दोन्ही राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह विविध स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांनी आपापले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. अर्ज दाखल करताना उमेदवारासह मर्यादित लोकांनाच दालनात प्रवेश देण्यात येत होता.
शिवसेनेतर्फे मंत्री भरत गोगावले,आ.महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे, शेकापतर्फे माजी आ.जयंत पाटील,काँग्रेसचे महेंद्र घरत,भाजपतर्फे आम.प्रशांत ठाकूर,राष्ट्रवादीतर्फे माजी अनिकेत तटकरे आदींच्या उपस्थितीत उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
आघाडी, युतीबाबत संभ्रमावस्था
रायगडात महायुती विरुद्ध महाआघाडी असा राजकीय सामना लोकसभा,विधानसभा निवडणुकीत झालेला होता.मात्र त्यानंतर मात्र नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत मोठ्या प्रमाणात संघर्षउफाळून आला.विशेष करुन महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी अनेक नगरपालिकांमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढविली आहे.याशिवाय अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी आपापल्या सोयीनुसार महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी युती,आघाडी करुन परस्परांना शह,काटशह देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
यावेळी जिल्हा परिषद,पंचायत समितींच्या निवडणुकाही याच धर्तीवर लढण्याची घोषणाही महायुतीच्या घटक पक्षांनी असलेल्या शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आहेत.त्यामुळे यावेळी हे दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात कसे उभे ठाकतात की अन्य काही राजकीय समिकरणे निर्माण होतात हे येत्या दोन,चार दिवसात स्पष्ट होणार आहे.त्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या लढती अपेक्षित आहेत.