

अतुल गुळवणी
अलिबाग: साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने अलिबागसह संपूर्ण रायगडातील बाजारपेठांमध्ये आंब्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र, दर आवाक्याच्या बाहेर असल्याने सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता आलेली नाही. सध्या बाजारात रायगडातील हापूस 750 रुपये डझन दराने विकला जात आहे.
साडेतीन शुभमुहूर्तांपैकी दुसरा मुहूर्त म्हणून या सणाकडे पाहिले जाते. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी अनेक घरांमध्य अक्षय्यतृतीयेच्या दिवशी देवाला आणि पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आंबा खाल्ला जात नाही. या दिवसापासूनच आंब्याचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाला, असे मानले जाते.
या शुभ दिवशी घरोघरी आमरस-पुरीचा खास बेत केला जातो. रविवारी साजऱ्या होतअसलेल्या अक्षय्यतृतीयेलाही असाच फक्कड बेत अनेक घरांमध्ये साजरा होणार आहे.सोबत आंबेडाळ, हिरव्या कैरीचे पन्हे, आंब्याची तिखट गोड चटणी असा सुग्राह भोजनाचा बेत असणार आहे. रायगडात हापूस प्रमाणेच राजापुरी, नीलम, तोतापुरी, रायवळी या आंब्यांचीही लागवड होते.
हवामान आणि ऋतूचक्र
निसर्गचक्रानुसार अक्षय्यतृतीयेपर्यंत आंबा पूर्णपणे परिपक्व आणि खाण्यायोग्य होतो. त्यापूर्वीचा आंबा कच्चा किंवा कोवळा असू शकतो, म्हणून या मुहूर्तावर आंबा खाण्याची परंपरा असावी असा अंदाज वर्तवला जातो. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याला बाजारात प्रचंड मागणी असते. हा काळ हापूस आंब्याच्या हंगामाचा शिखर काळ मानला जातो. सध्या रायगडातही हापूसच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.