

रायगड : प्रसिद्ध माथेरान गिरीस्थान येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांची वाहनतळाची मोठी समस्या आता कायमची सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी येथील २२ हजार ३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा मोठा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने आज (३ जुलै) रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करून या जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी दिली आहे.
माथेरान (दस्तुरी), ता. कर्जत, जि. रायगड येथील भूखंड क्र. ९३, सीटीएस नं. ३ मधील २२ हजार ३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाची ही शासकीय जमीन आता माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या ताब्यात दिली जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार ही जमीन 'भोगवटादार वर्ग-२' या धारणाधिकाराने, पूर्णपणे विनामूल्य (भोगाधिकार मूल्यरहित) आणि महसूल मुक्त किंमतीने नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात येत आहे.
वर्ग २ च्या शासकीय अटी शर्तीनुसार हा भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने तिथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी नाक्यावरच पार्क करावी लागतात. सुट्ट्यांच्या काळात तिथे जागेअभावी वाहनांच्या प्रचंड रांगा लागत असत. आता तब्बल २२ हजार चौरस मीटरहून अधिक जागा पार्किंगसाठी मिळाल्याने पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार असून माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
दरम्यान, फिरायचा प्लॅन ठरला की अनेक जण प्राधान्य देतात ते माथेरानला. मुंबई, पुणे आणि नाशिकपासून सर्वात आणि निसर्गरम्य असं ठिकाण असल्याने माथेरानला कायमच पसंती दिली जाते. याचमुळे अनेकदा या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी येथील २२ हजार ३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा मोठा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक सुट्टयांच्या हंगामात पर्यटकांची माथेरानला पसंती असते, मात्र नेहमीच त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने यापुढे माथेरान नको रे बाबा असे सूर पर्यटकांमध्ये उमटत असतात. मुलाबाळांना घेऊन इथल्या निसर्ग सान्निध्यात एकरूप व्हावे जेणेकरून नेहमीच्या कामाचा शीण घालविण्यासाठी शांत वातावरणाचे माथेरान हेच एकमेव जवळचे ठिकाण आहे. त्यामुळेच इथे पर्यटकांकडून अधिक पसंती दिली जाते. परंतु स्वतः च्या वाहनाने आल्यास येथील वाहतूक कोंडीमुळे तसेच पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. तरीसुद्धा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने भर पावसात मुलाबाळांना घेऊन पर्यटकांना पायपीट करावी लागत असल्याने त्यांचा वेळ व पैसा वायफळ खर्च होत असल्याच्या तक्रारी पर्यटकाच्या होत्या.