

रायगड; पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्यासाठी 'पहिले पाऊल' या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. प्रारंभी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राज्यभरात राबवला जाणार असल्याने समग्र शिक्षा अभियान प्रकल्पाने हालचाली सुरू केल्या आहेत.
'पहिले पाऊल' या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शाळांमध्ये मागील काही महिन्यांपासून नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्याची उद्यापासून सुरुवात होणार आहे. ३० एप्रिलला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होईल; तर कोल्हापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी जिल्ह्यांत शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
ग्रामीण भागात शालेय शिक्षण विभागासोबत महिला बाल विकास, स्थानिक सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे . सन २०२३ २४ या शैक्षणिक – वर्षात इयत्ता पहिलीत दाखल मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी 'पहिले पाऊल' महत्त्वाचे ठरणार आहे
हा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर राबवला जाणार असल्याने त्यातून शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल. 'पहिले पाऊल' कार्यक्रमांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे होणार आहेत.
'पहिले पाऊल' उपक्रमाचा पहिला टप्पा आता सुरू झाल्यानंतर दुसरा टप्पा जून महिन्यात सुरू होईल. त्यावेळी शालेय शिक्षण, महिला व बालविकास आणि सहभागी घटकांनी सहभागी होऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता-पालकांना, मुख्याध्यापक व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.