

वरसे: मार्गावर सध्या मोकाट जनावरांचा मोठा वेढा पाहायला मिळत आहे. या मार्गावर धाटाव औद्योगिक क्षेत्र असल्याने दररोज हजारो कामगार, अवजड वाहने आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मध्योभागी तासन्तास ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट गुरांमुळे अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून वाहनधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावर अचानक येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्यावरच जनावरांचे घोळके विश्रांती घेत असल्याने अनेकदा वाहतूक ठप्प होते. भरधाव वाहनांच्या धडकेत अनेक निष्पाप जनावरेही गंभीर जखमी होत असून काहींचा मृत्यू झाला आहे.
अनेक स्थानिक पशुपालक आपल्या गाई-म्हशींना दूध काढल्यानंतर उघड्यावर चरण्यासाठी सोडून देतात. ही जनावरे दिवसभर आणि रात्रीही रस्त्यावरच ठिय्या मांडतात. नगरपरिषद, महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
रस्त्यावरील मोकाट गुरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, संबंधित पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांना कोंडवाड्यात हालवावे, अशी तीव्र मागणी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना आणि स्थानिक वाहनधारकांकडून केली जात आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर मोठा अघटित अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला फटका
धाटाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये रात्रं-दिवस पाळ्यांमध्ये काम करणारे हजारो कामगार या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांनी ये-जा करतात. तसेच कच्च्या आणि पक्या मालाची वाहतूक करणारे अवजड ट्रक आणि कंटेनर या रस्त्यावरून सतत धावत असतात.
रात्रीच्या वेळी अथवा पावसाळ्यात रस्त्यावर अंधार, अनधिकृत पणे गाडयांना बसाविलेले सफेद व पिवळ्या रंगांचे लाईट किंवा धुके असताना ही जनावरे अचानक समोर येतात, ज्यामुळे ब्रेक दाबेपर्यंत अपघात घडलेले असतात.