

Mumbai Division Railway Fine
रोहे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट व अनियमित प्रवासाविरोधातील विशेष मोहीम अधिक तीव्र करत १ जून ते ९ जुलै २०२६ या कालावधीत २ लाख १० हजार प्रकरणे उघडकीस आणली. या कारवाईत प्रवाशांकडून तब्बल १३ कोटी १३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
१ जून ते १९ जून या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी १ लाख १४ हजार विनातिकीट अथवा अयोग्य तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी पकडले. त्यावेळी किमान दंड २५० रुपये असल्याने या कालावधीत ६ कोटी १५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने १९ जून २०२६ पासून विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये केला. त्यानंतर २० जून ते ९ जुलैदरम्यान मुंबई विभागाने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ९६ हजार २६ प्रकरणे उघडकीस आली असून त्यातून ६ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबई विभागाकडून वातानुकूलित उपनगरीय लोकल आणि प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्येही नियमित तसेच विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वे सध्या वातानुकूलित उपनगरीय लोकलच्या १२० फेऱ्या चालवित असून, या सेवांमध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडामध्ये वातानुकूलित लोकलमधील १८ हजार ७५६ प्रकरणांतून ७८ लाख ३१ हजार रुपये, तर प्रथम श्रेणीच्या डब्यांमधील १३ हजार १९८ प्रकरणांतून ५३ लाख ३१ हजार रुपयांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, सातत्याने राबविण्यात येणाऱ्या तिकीट तपासणी मोहिमांमुळे विनातिकीट प्रवासाला आळा बसत असून रेल्वेचा महसूल सुरक्षित ठेवण्यास मदत होत आहे. मेल-एक्सप्रेस तसेच उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये अशा विशेष मोहिमा नियमितपणे राबविल्या जात असून त्यातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते.
रेल्वे प्रशासनाने वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे. प्रवाशांनी गैरसोय व दंड टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले असून विनातिकीट प्रवासाबाबत 'शून्य सहनशीलता' धोरण कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.