

रोहै: मध्य रेल्वेने एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत ५३८७ रॅकद्वारे १४.१३ दशलक्ष टन मालवाहतुक केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५०४७ रॅकद्वारे १३.५७ दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती; त्या तुलनेत टनभारामध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-मे २०२६ मध्ये रॅकच्या संख्येत ३४० रॅकची वाढ झाली आहे.एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत मालवाहतुकीतून एकूण १४४२.५१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
एप्रिल ते मे २०२६ मध्ये एकूण १४.१३ दशलक्ष टन मालवाहतुकीपैकी नागपूर विभागाने ८.२८ दशलक्ष टन (५९%) मालवाहतूक करून सर्वाधिक योगदान दिले आहे. त्यानंतर मुंबई विभागाने ३.४१ दशलक्ष टन (सुमारे २४%) मालवाहतूक केली आहे. इतर विभागांच्या योगदानामध्ये सोलापूर विभागाचा १.२५ दशलक्ष टन (९%), भुसावळ विभागाचा ०.८८ दशलक्ष टन (६%) आणि पुणे विभागाचा ०.३१ दशलक्ष टन (२%) वाटा आहे.
एकूण १४४२.५१ कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी, नागपूर विभागाने ८६२.८१ कोटी रुपयांचे (सुमारे ६०%) उत्पन्न मिळवून सर्वाधिक योगदान दिले आहे; त्यानंतर मुंबई विभागाने ३२०.५४ कोटी रुपयांचे (२२%) उत्पन्न मिळवले आहे. इतर विभागांमधील भुसावळ विभाग १०६.१० कोटी रुपये (७%), सोलापूर विभाग ८८.४८ कोटी रुपये (६%) आणि पुणे विभाग ६४.५८ कोटी रुपये (५%) एवढे आहे.
मध्य रेल्वेने आपल्या मालवाहतूक कामकाजाला मोठी चालना देत ३१ मे २०२६ रोजी 'वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'द्वारे 'गेट टर्मिनल इंडिया' (GTI), JNPT ते 'कॉनकॉर'चे (CONCOR) 'गती शक्ती कार्गो टर्मिनल', गुजरात (CGMV) या दरम्यान सेवा यशस्वीपणे सुरू केली. यामुळे किनारपट्टीवरील बंदरांना थेट मुख्य भूभागातील औद्योगिक केंद्रांशी जोडणाऱ्या नियमित आणि नियोजित कंटेनर मालवाहतूक सेवेची सुरुवात झाली आहे.
मालवाहतुकीचे कामकाज सांभाळतानाच त्याच वेळी प्रवाशांचे प्रचंड मोठे जाळे सुरळीतपणे चालवणे हे एक अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वपूर्ण कार्य आहे. १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत मध्य रेल्वेने मालगाड्यांव्यतिरिक्त सुमारे ३४,७०० मेल/एक्सप्रेस (यात नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि विशेष 'मागणीनुसार चालवल्या जाणाऱ्या गाड्या' यांचा समावेश आहे) आणि १,०८,९०० उपनगरीय (लोकल) गाड्यांच्या सेवा यशस्वीपणे चालवल्या.
या सर्वांची एकत्रित सरासरी दररोज २,३५५ इतकी होती. मोठ्या क्षमतेच्या या कामकाजाद्वारे, प्रवासी आणि अत्यावश्यक औद्योगिक माल यांची जलद, किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणावरील वाहतूक सुनिश्चित करून मध्य रेल्वे देशाच्या आर्थिक विकासाला सातत्याने चालना देत आहे.