

कळंबोली: सायन-पनवेल महामार्गावर खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर उष्णतेमुळे एक धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करत असताना एका तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसल्याने त्याची प्रकृती बिघडली आणि तो रस्त्याच्या कडेला थांबून काही क्षणातच फुटपाथवर कोसळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण सायन-पनवेल महामार्गावरून पुण्याकडे जात होता. दुपारच्या तीव्र उकाड्यामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. परिस्थिती गंभीर होत असल्याची जाणीव होताच त्याने तत्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली; मात्र काही क्षणातच त्याला चक्कर येऊन तो फुटपाथवर कोसळला.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जवळच वाहतूक नियंत्रणासाठी उभ्या असलेल्या पोलिसांना त्यांनी आवाज देऊन बोलावले. वाहतूक पोलीस सागर ठाकूर, सुधीर राठोड, अश्विनी राठोड आणि रामेश्वर खताळ यांनी कोणताही वेळ न दवडता तत्परतेने त्या तरुणाला उचलून जवळील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर संबंधित तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून उष्णतेचा प्रचंड कहर सुरू आहे.
या घटनेत दाखवलेल्या तत्परतेबद्दल नवी मुंबई पोलीस उपआयुक्तांनी वाहतूक पोलीस सागर ठाकूर, सुधीर राठोड, अश्विनी राठोड आणि रामेश्वर खताळ यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे त्या तरुणाचा जीव वाचल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. गरज असेल तरच दुपारच्या वेळेत घराबाहेर पडावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच उन्हापासून बचाव करण्याच्या उपाययोजना कराव्यात.
- नितीन पाटील, महापौर, महानगरपालिका, पनवेल