

जयंत धुळप
रायगड: अलिबाग जवळच्या ऐतिहासिक सागरगडाच्या संवर्धनात महत्त्वाची बाब समोर आली आहे. दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या शिलेदारांच्या चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एक प्राचीन, ऐतिहासिक साखळीच्या विहीरचे अखेर पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे. विहिरीतील गाळ आणि माती उपसून ती पुन्हा वापरायोग्य बनवण्यात आली असून, गडावर पाण्याचा प्राचिन स्त्रोत नव्याने उपलब्ध झाला आहे.
साखळीची विहीर म्हणून ओळख असलेली ही विहीर त्रिकोणी असून स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. विहिरीची खोली सुमारे 9 फूट असून, यात उतरण्यासाठी उत्तरेच्या बाजूने घडीव सहा पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
गेल्या 4 महिन्यांपासून दुर्गरक्षक संस्थेचे धारकरी या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी झटत होते. विहिरीत वर्षानुवर्षे साठलेली माती आणि दगड-धोंडे पूर्णपणे बाहेर काढून विहीर मोकळी करण्यात आली.
गडाच्या सपाटीवरील माती पुन्हा विहिरीत वाहून जाऊ नये, यासाठी तिथे एक मजबूत जलरोधक भिंत उभारण्यात आली. विहिरीच्या भिंतीचा एक भाग पूर्णपणे ढासळला होता. दुर्गरक्षकच्या शिलेदारांनी विहिरीच्या पोटात पडलेले ऐतिहासिक घडीव दगड शोधून, ती भिंत पुन्हा पूर्ववत बांधून काढली.
विहिरीच्या पुनरुज्जीवनाच्या या मोहिमेत दुर्गरक्षकसंस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ नाईक यांच्या नेतृत्वाखाली वरद पवार, श्रद्धा जुईकर, सागर पाटील, वेद पवार, सिद्धार्थ नाईक , सागर पाटील, तेजस पवार, अविनाश पिंगळे, प्रसाद मुळुस्कर, कल्याण जुईकर, विक्रांत पाटील हे शिलेदार सहभागी झाले होते.
दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या सर्व शिलेदारांचे कौतुक करायला हवे. 400 वर्षांपूर्वी सामरीक स्थान विचारात घेवून, सागरगडाची उभारणी करताना नैसर्गिक जलस्त्रोचा अभ्यास करुन या साखळीच्या विहिरीची निर्मीती करण्यात आली. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंवर्धनाची पायाभरणी केली. कालओघात बुजलेली ही विहिर जिवंत करण्याचे मोठे काम या तरुणांनी केले आहे.
- रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज