

Taliye Landslide Rehabilitation Demand
रायगड: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होत आली, तरी अद्याप सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आलेले नाही, ही गंभीर बाब विशेष वृत्ताच्या माध्यमातून 'दै. पुढारी' आणि पुढारी न्यूजने ३० जुन रोजी प्रसारित केले होते. त्याची दखल घेवून ही बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज (दि. ३) सभागृहाच्या निदर्शनास आणून तळीयेतील सर्व दरडग्रस्त कुंटूंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होत आली, तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आलेले नाही. ही बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याची मागणी दानवे यांनी केली.
अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात मागील काही काळात पुणे जिल्ह्यातील माळीण गाव, रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये आणि कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्यूमुखी पडल्यानंतरही सरकारने याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
दरडग्रस्त तळीये गावात दरड कोसळून 66 लोकांचा मृत्यू झाला असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले होते. परंतु आतापर्यंत फक्त 66 कुटुंबांना घरे मिळाली असून बाकीचे कुटुंब अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. तसेच सदरील ठिकाणी अजूनही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणीही दानवे यांनी केली. याशिवाय या पावसाळ्यात या दरडग्रस्त भागात अशाच काही घटना घडण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त करत म.वि.प. नियम 289 अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधान परिषद सभागृहात सूचना केली.