रायगड : अलिबाग बैलगाडी शर्यतींना अपघाताचे गालबोट
अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : अलिबाग समुद्र किनारी मंगळवारी धुळवडीनिमीत्त आयोजित बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वारांच्या शर्यतींना अपघाताचे गालबोट लागले आहे. भरधाव बैलगाडी शर्यती पहाणाऱ्या नागरिकांमध्ये घुसल्याने राजाराम धर्मा गुरव (वय ७५ रा. झिराड) आणि विनायक नारायण जोशी (वय ७०, रा. ब्राम्हण आळी, अलिबाग) हे दोघे जखमी झाले. दोघा जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवत असतांना विनायक जोशी यांची वाटेतच प्राणज्योत मालवली आहे.
अलिबाग समुद्र किनारी आमदार महेंद्र दळवी पूरस्कृत या शर्यतींचे आयोजन अलिबाग कोळीवाडा शर्यतप्रेमींच्यावतीने करण्यात आले होते. अलिबाग समुद्र किनारी धुळवडीच्या दिवशी होणाऱ्या या बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वार, सायकलस्वार यांच्या शर्यतीना प्राचिन परंपरा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार गेल्या काही वर्षांपासून या शर्यतींच्या आयोजनात खंड पडला पडला होता. मात्र न्यायालयाने काही अटिशर्तीवर शर्यती आयोजित करण्याकरिता परवानगी दिल्याने यंदा या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. परिणामी आयोजक आणि शर्यतप्रेमी यांच्यामध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे शर्यत शौकीनांनी देखील समुद्र किनारी शर्यती पहाण्याकरिता मोठी गर्दी केली होती. भरधाव बैलगाडी शर्यती पहाणाऱ्या नागरिकांमध्ये घुसल्याने जखमींपैकी विनायक नारायण जोशी यांची मुंबईला उपचाररासाठी जात असताना प्राणज्योत मालवली. तसेच राजाराम गुरव हे देखिल गंभिररित्या जखमी झाले असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालायत पाठविण्यात आले आहे.
शर्यतींच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा ऐरणीवर
अलिबाग पोलीसांच्या माध्यमातून यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्याच बरोबर आयोजकांकडूनही सुरक्षा विषयक उपाययोजना अधिकाधिक करण्यात आली होती. मात्र शर्यतसौकीनांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. काही शर्यत शौकीन सुरु किनाऱ्यांवर खाली उतरल्याचे दिसून आले. आणि अशातच शर्यतीतील एका बैलगाडीने वेगाने शर्यत पाहाणाऱ्यां नागरिच्या गटालाच धडक दिल्याने हा अपघात झाला असून त्यात दोन शर्यत शौकीन जखमी झाली आहेत. दरम्यान या प्रकरणी अलिबाग पोलीसांकडून पूढील कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र अलिबाग समुद्र किनारच्या या शर्यतीमधील या अपघातामुळे आता शर्यतींमधीर सुरक्षिततेचा मुद्दा पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.