

अलिबाग : रमेश कांबळे
गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली आहे. 2024 ते ऑक्टोबर 2025पर्यंत झालेल्या अपघातांमध्ये एकूण 209 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 520 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील बहुतांश अपघात हे जिल्ह्यातील महामार्गांवर झाले असून अतिवेगामुळे अथवा बेदरकारपणामुळे झाले आहेत. यामुळे जिल्हा वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यात एकूण नउ राष्ट्रीय महामार्ग असून यातील सहा महार्गांवर 45 ब्लॅकस्पॉट आहेत. यामध्ये सर्वांत जास्त ब्लॅकस्पॉट हे मुंबई-गोवा महामार्गावर असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. या महार्गांवर 2024 ते ऑक्टोबर 2025पर्यंत झालेल्या एकूण 183 दाखल अपघातांमध्ये 209 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 520 जण गंभीर झाले आहेत. त्याचप्रमाणे 165 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेग, मद्यपान करून वाहने चालविणे, दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर न करणे अशा प्रकारांमुळे अपघात होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना
ब्लॅकस्पॉटवर आवश्यक ठिकाणी गतिरोधक, द्रम्बल स्ट्रीप, वेगमर्यादा, दिशादर्शक फलक लावणे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती
रस्ता सुरक्षा रॅलीतून नागरिकांमध्ये जनजागृती
एसटी चालक, ट्रक, बसचालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक प्रशासनाकडून विविध उपाययोजना तसेच सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. सध्या सोशल मिडीयाचा सर्वांत जास्त वापर होत असल्याने रस्ता सुरक्षाबाबत लहान व्हिडिओ, डिजीटल बॅनर्स, स्लोगन तयार करून त्याद्वारेही जनजागृती करण्यात येत आहे.
अभिजीत भुजबळ, जिल्हा वाहतूक निरीक्षक