

कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीत केबीके नगर वसले आहे. यात सुमारे 50 चाळी असून या उल्हास नदीच्या जवळ आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे उल्हास नदीला पूर येऊन पुराचे पाणी हे चाळीत शिरले आहे. अनेक चाळींमध्ये कमरेभर पाणी शिरल्यामुळे प्रशासनाकडून येथील सुमारे 1200 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर घरात पाणी शिरल्यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात या नागरिकांना पुराच्या धोक्यामुळे धोका निर्माण होतो. तेव्हा आमचे पुनर्वसन करा अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ जवळ रेल्वे पट्ट्याला शेलु ग्रामपंचायत वसली आहे. मुंबईला रेल्वे मार्गाने जोडलेली असल्यामुळे मागील काही वर्षात या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकीकरण झाले. तर मुंबई आदी शहरातील मध्यमवर्गीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी येथील मोठ्या इमारतींसह येथे चाळी उभारण्यात आल्या. कमी किंमतीत हक्काची घर मिळणार म्हणून नागरिक देखील आकर्षित झाले. मात्र या केबीके नगरच्या चाळी या गावाच्या बाहेरच्या भागात उल्हास नदीच्या जवळ उभारण्यात आल्या. तर एक दोन नव्हे तर एका चाळीत 22 रूम असलेल्या अशा सुमारे 50 चाळीची उभारणी बिल्डरकडून करण्यात आली होती. हळूहळू येथील बहुतेक घर विकली जाऊन नागरिक येथे आपला संसार घेऊन वसले. मात्र 2021 रोजी मोठा पाऊस होऊन उल्हास नदीने रौद्र रूप धारण केले व पुराचा पहिला फटका या चाळीना बसला. त्यानंतर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येथील रहिवाशांना पुराची भीती सतावते. तर 2021 च्या पुरामध्ये अनेक घरात अचानक पाणी शिरून अनेकांचा संसार हा उद्ध्वस्त झाला होता.
मागील काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे यंदा पुन्हा उल्हास नदीने आपले उग्र रूप धारण केले आहे. गुरुवारी 25 जुलै रोजी कर्जत तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यासोबतच केबीके नगर भागात देखील उल्हास नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अगोदरच अलर्ट मोडवर असलेल्या प्रशासनाने येथील सुमारे 310 कुटुंबांचे स्थलंतर केले आहे. यामध्ये 1265 नागरिकांचा समावेश आहे. महसूल विभागाचे नेरळ मंडळ अधिकारी संजय जांभळे, शेलू सजा तलाठी वैशाली मांटे, महेंद्र चौरे नेरळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आदींनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी वेळेत हलवले. तर त्यांना नाष्टा, जेवण आदी सुविधा देखील पुरवल्या आहेत. यासह पाऊस अजूनही सुरू असल्याने पाण्याचे प्रमाण वाढते आहे. तेव्हा इतर चाळींमधील नागरिकांना देखील सतर्क राहण्यासाठी कळवण्यात आले होते. मंडळ अधिकारी जांभळे यांच्याकडून आपत्कालीन व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सध्या बाजूला असलेल्या एका इमारतीत या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास येथील सत्संग भवन आदी ठिकाणी देखील अधिकच्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर याठिकाणी प्रांताधिकारी अजित नैराळे, कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे यांनी भेट देत नागरिकांना धीर दिला. तर परिस्थितीचा आढावा घेत कर्मचार्यांना सूचना देखील केल्या आहेत.
दरवर्षी केबीके नगर भागातील नागरिक 2013 पासून येथे राहत आहेत. मात्र दरवर्षी येथे पूरस्थिती असते. मात्र तरीही आम्ही कोणतीही शासकीय मदत न घेता या परिस्थितीला सामोरे जातो आणि त्यातून सावरतो. मात्र अजून किती वर्ष हे सहन करणार? त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या केबीके नगर वासियांचे पुनर्वसन करावे ही त्यांना विनंती.
- जनार्दन कदम, ग्रामस्थ केबीके नगर
शेलू केबीके नगर येथील चाळींमध्ये दरवर्षी पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसार उघड्यावर पडतात. घरातील अन्नधान्य, वस्तू आदींचे नुकसान होते. तेव्हा यातून सावरताना त्यांची देखील दमछाक होते. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे.