पुणे; पुढारी वृत्तसेवा: आगामी काळात राज्यात होणार्या महापालिका आणि नगर परिषदेत आम आदमी पक्ष (आप) पूर्ण ताकदीने उतरणार आहे. कोणत्याही पक्ष अथवा संघटनेशी तूर्तास युती करणार नसून, स्वबळावर लढणार असल्याची माहिती 'आप'चे राज्य संघटक विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपमध्ये माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि अॅड. धनराज वंजारी यांनी प्रवेश केला. त्या निमित्ताने ते प्रथमच पुण्यात आले होते.
राठोड म्हणाले, 'या पक्षाची निर्मिती संघर्षातून झाली असल्याचे सर्वच जनतेने पाहिले आहे. राजकारण म्हणजे पैसा ही धारणा मोडून काढत साध्या कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम आपचे केजरीवाल यांनी केले. अशा पक्षासोबत जाण्याचा विचार केला असून, आगामी सर्व निवडणुकांत आम्ही ताकदीने युवकांसमवेत उतरणार आहोत.'
अॅड. वंजारी म्हणाले, 'ओबीसी आरक्षण न देता अकलेचे तारे तोडले जात आहेत. राजकीय ओबीसी आरक्षण गेलेच आहे. जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. ओबीसींची 78 टक्के संख्या असताना 16 आणि 27 टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कराचा पैसा परत करणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे, या मुद्द्यावर स्थानिक निवडणुका लढवल्या जाणार आहेत.'