कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर भागात विद्युत विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. शिवशंभोनगर गल्ली 3 व 4 मध्ये मंगळवारी दुपारी वीज गेली. त्यामुळे नागरिकांनी एमएससीबी विभागात तक्रारी केल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत वीजपुरवठा येईल, असे सांगण्यात आले. मात्र, बुधवार सकाळपर्यंत वीज आली नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.
मात्र, काही भागात एक फेज गेल्याने त्यांना विद्युत उपकरणे चालवता आली नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून पाणी न आल्यामुळे नागरिकांना टाकीत पाणी चढवण्यासाठी वीजपुरवठा नसल्याने अडचणी आल्या. त्यामुळे एकाच वेळी वीज आणि पाणी नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली. या संदर्भात अभियंता बोरे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, विद्युत केबल जळाल्यामुळे पुरवठा खंडित झाला होता. जोरदार पाऊस सुरू असल्याने केबल जोडणे व बदलणे अशक्य होते. पाऊस कमी झाल्यानंतर हे काम केले. त्यामुळे विलंब लागला.