वाकड : पुढारी वृत्तसेवा : म्हातोबानगर झोपडपट्टी येथे पाण्याच्या पाइपलाइनमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर पाणी गळती बंद करण्याची मागणी केली आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे यामध्ये खराब पाणीही मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यामुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांना यामुळे खराब पाणी येण्याची शक्यता असून, त्यामुळे गॅस्ट्रो सारख्या आजाराला आमंत्रण देण्यात येत आहे.
या साठलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास मदत होते. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे लोकांना चालणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाणी गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची लाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.