लोहगाव-वाघोली रस्ता नव्हे, तळे !

लोहगाव-वाघोली रस्ता नव्हे, तळे !
Published on
Updated on

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाईन टाकली नसल्याने लोहगाव-वाघोली मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्त्रोतही बंद करण्यात आल्याने पाणी कमरेपर्यंत पोहोचले असून, रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. प्रशासनाने तत्काळ हा प्रश्न मार्गी लावून या समस्येतून सुटका करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमीनगर जवळ मागील चार दिवसांपासून पावसाचे पाणी साचले आहे. ड्रेनेज लाईनमध्ये गाळ साचल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. तर, नैसर्गिक स्रोत भराव टाकल्यामुळे बंद झाले असून पावसाळी लाईन नसल्याने पाणी कमरेइतके साचून याठिकाणी तळे तयार झाले आहे.

पाण्यातून मार्ग काढताना वाहने बंद पडण्याच्या घटनादेखील घडत आहेत. याखेरीज, वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. याबाबत, महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर पाण्याचा निचरा करण्याचे काम आमचे नाही, असे मलनि:सारण विभागाकडून सांगितले जाते. पथ विभागाला संपर्क केला असता हे मलनि:सारण विभागाचे काम असल्याचे पथ विभाग सांगते. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयदेखील लक्ष देत नसल्याची तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहे. नागरिक अक्षय शिंदे म्हणाले, पाण्यामुळे वाहतूक कोंडी होत असून टेम्पो, दुचाकी घसरून अपघात होत आहेत. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत.

लोहगाव-वाघोली रस्त्यावर पावसाळी लाईनची आवश्यकता आहे. पाण्याच्या समस्येतून सुटका करण्यासाठी नियोजन करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यावर पावसाळी लाईन टाकण्याचे काम पथ विभागामार्फत करण्यात येईल.
– व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news