लोणी भापकर; पुढारी वृत्तसेवा: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वर्षीय चिंकारा जातीच्या मादी हरणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच बारामती तालुक्यातील मुढाळे येथील चिकणे पाटीपासून काही अंतरावर घडली. मुढाळे येथील युवक सागर चिकणे हा बारामतीकडे जात असताना सकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा जातीचे हरीण जखमी झाल्याचे निदर्शनास आले. सागरने कुत्र्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने ते एकट्याला शक्य झाले नाही. अशातच सागरने दलित पँथर बारामती तालुकाध्यक्ष शंतनू साळवे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कसलाही विलंब न लावता वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर वनरक्षक वैभव कंक हे घटनास्थळी दाखल झाले. हरीण गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे उपचारापूर्वीच ते मृत पावले. शवविच्छेदन करण्यासाठी त्यास पणदरे येथे नेण्यात आले. त्यानंतर पणदरे येथील वनविभाग हद्दीत त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा जातीची हरणे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पोल्ट्री व्यावसायिक मेलेल्या कोंबड्यांची (पक्ष्यांची) योग्य विल्हेवाट लावत नसल्याने भटकी कुत्री वाढत आहेत. या भटक्या कुत्र्यांनी परिसरातील शेळ्या, मेंढ्या, गाई यांच्यावरदेखील हल्ला केल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजून किती हरणांचा जीव गेल्यानंतर वनविभाग भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करेल, असा सवाल वन्यजीवप्रेमी यांनी केला आहे.