वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: एकनाथ खडसे विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आणि सत्ता गेली. यावरून गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, महाजन यांनी आयुष्यभर माझी पादत्राणे हातात घेवून मते मागितली आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या पादात्रणांची जास्त काळजी आहे. माजी मंत्री खडसे रविवारी (दि. 10) माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर नेते एकमेकांवर खरपूस टीका करीत आहेत. शनिवारी महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका केली होती. खडसे मंदिरात गेले तेथे प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेल्याची खडसेंची अवस्था झाली आहे, असे ते म्हणाले. यासंदर्भात पत्रकारांनी खडसे यांना विचारले असता खडसे म्हणाले, महाजन हे मॅच्युरीटी नसलेले नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यांना काडीचीही किंमत नाही. त्यांनी आजवर माझी पादत्राणे हातात घेवून मते मागितली आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या पादत्राणांची जास्त काळजी आहे.