महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना साहाय्यभूत ठरणार्या विविध अवजारांची व कृषिपंपांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 22 ऑगस्ट ही शेवटीची मुदत आहे. मात्र, घोडेगाव येथील आंबेगाव तालुका पंचायत समिती कृषी कार्यालयाकडून शेतकर्यांना मागणी अर्ज पुरविण्यात येत नाही. यामुळे शेतकर्यांनी गैरसोय होत आहे.
पंचायत समिती कार्यालयाकडून अर्ज मिळत नसल्याने खासगी दुकानदारांकडून भरमसाट रक्कम घेऊन अर्ज विक्री केली जात आहे. दोन पाने मागणी अर्ज असताना पाच पाने मागणी अर्ज खासगी दुकानदार देत आहेत. त्यासाठी शेतकरी निमुटपणे पैसे मोजत असल्याचे चित्र घोडेगाव पंचायत समिती कार्यालयासमोरील दुकानांमध्ये दिसत आहे.
पंचायत समितीच्या कार्यालयात सुमारे दीड हजार अर्ज शेतकर्यांनी दाखल केले आहेत. अर्जासोबत सातबारा, '8-अ'चा उतारा, आधार कार्ड, बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स आदी कागदपत्रे जोडली जात आहेत. परंतु, अर्ज स्वीकारणारे लिपिक मागणी अर्ज तपासून घेत नाहीत. अनेकांना पोहोचही दिल्या जात नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
शेकडो शेतकरी तालुक्याच्या कानाकोपर्यांतून हे अर्ज भरण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात येत आहेत. त्यात शासकीय सुट्या येत असल्याने अनेकांना अर्ज दाखल करता येत नाही. निवड झालेल्या लाभार्थी शेतकर्यांना कोणकोणत्या वस्तू मिळतील, उद्दिष्ट किती, वस्तूंची संख्या किती, याबाबत कार्यालयाकडून कोणतीही माहिती शेतकर्यांना देण्यात आली नाही. 'मागणी अर्ज तुम्ही बाहेर विकत घ्या, आमच्याकडे उपलब्ध नाहीत,' असे कार्यालयातील कर्मचारी सांगत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या योजनांसाठी मोफत अर्ज नाहीत
पुणे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी मोफत अर्ज नाहीत. नमुना अर्ज कार्यालयात ठेवण्यात आला आहे. शेतकर्यांनी त्याची झेरॉक्स प्रत काढून अर्ज भरून द्यावेत, अशी माहिती घोडेगाव पंचायत समिती कृषी अधिकारी मनोज कोल्हे यांनी दिली.