पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा तडाखा वाढल्याने शहरातील सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, सोमवारपासून चार दिवसांत महापालिकेकडे 133 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक 30 तक्रारी आल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरण साखळीतील पाणीसाठा कमी आहे. उन्हाळ्याचे दोन महिने अद्याप बाकी आहेत.
या कालावधीत पाण्याची मागणी वाढते. तसेच बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. त्यातच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केल्या गेलेल्या 34 गावांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. समाविष्ट गावांत काही ठिकाणी चार, तीन, दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. सूस, म्हाळुंगे, पिसोळी या गावांना चार दिवसांतून तर होळकरवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांना तीन दिवसांतून पाणीपुरवठा होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी जाहीर केलेल्या क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. या क्रमांकावर सोमवारपासून 133 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये पाणी न येणे, पाणी कमी दाबाने येणे, पाणी लवकर जाणे अशा तक्रारींचा समावेश आहे. यात सर्वाधिक हडपसरमधील 30 आणि नगर रस्ता परिसरातील 11 तक्रारींचा समावेश आहे.
गेल्या वर्षी या गावांत प्रतिदिन 1 हजार 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने ही संख्या प्रतिदिन 1 हजार 235 वर नेली होती. त्यानंतरही पाण्याची समस्या तीव्रच आहे. त्यामुळे प्रतिदिन 1400 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले. समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार केला जात असून, तो लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
औंध-बाणेर-19, भवानी पेठ-02, बिबवेवाडी-08, धनकवडी-सहकारनगर-11, ढोले पाटील – 03, हडपसर-30, कसबा पेठ-05, कोंढवा- येवलेवाडी- 14, कोथरूड-बावधन-03, नगर रोड- 11, शिवाजीनगर – 03, सिंहगड रस्ता – 05 , वानवडी – 04 , वारजे – 07 आणि येरवडा – 07
हेही वाचा