पुणे : विमानतळासाठी जबरदस्तीने जमीन घेणार नाही

सासवड (ता. पुरंदर) येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
सासवड (ता. पुरंदर) येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
Published on
Updated on

सासवड, पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जबरदस्तीने कुणाचीही जमीन घेतली जाणार नाही. जमीन संमतीने घेतली जाईल, चांगला मोबदला दिला जाईल आणि त्यानंतरही ज्या लोकांचा विरोध आहे, त्यांना बाजूला राहू द्या. हा प्रकल्प आपल्याला सर्वांच्या संमतीने करायचा आहे. आपण चर्चा करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सासवड (ता. पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ मैदान क्र. 1 येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात मंगळवारी ते बोलत होते.

इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यावर, या भागामध्ये कसा फायदा होतो, हे तुमच्या लक्षात येईल. लोकांच्या हिताचा हा पुरंदरचा विमानतळ दुसरीकडे नेण्याचा कोणीतरी प्रयत्न करत होते, आता तो थांबलेला आहे. जे चांगले प्रकल्प आहेत, जे लोकांच्या हिताचे आहेत, ते आपण करू, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या वेळी माजी मंत्री विजय शिवतारे, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, आ. गुलाबराव पाटील, आ. उदय सामंत, आ. तानाजी सावंत, आ. शहाजी बापू पाटील, रमेश कोंडे, अ‍ॅड. गीतांजली ढोणे, डॉ. ममता लांडे, दिलीप आबा यादव, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, भाजपाचे जालिंदर कामठे, गणेश भेगडे, गंगाराम जगदाळे आदी पदाधिकार्‍यांसह हजारो शेतकरी उपस्थित होते.

अनेक प्रकल्पांची घोषणा

पुरंदर-हवेलीच्या अनेक प्रकल्पांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते म्हणाले, गुंजवणी धरण व वितरण व्यवस्था बंद जलवाहिनी योजनेसाठी 50 कोटी रुपये देण्यात येतील. दिवे येथील महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय बाजार संकुलासाठी अडचणी दूर करून त्याच ठिकाणी मंजुरी देण्यात येईल. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील बाधित शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन विमानतळासाठी प्रयत्न करणार. फुरसुंगी-उरुळी देवाची पाणी योजनेसाठी 25 कोटी देण्यात येतील. या योजनेचा 4 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट 11 गावांचे करवाढीसंबंधीही तातडीने निर्णय घेऊ.

या वेळी बोलताना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना मी पत्रे दिली, पण त्यांनी मला काहीही प्रतिसाद दिला नाही. मी त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीशी फारकत घ्या, असे सांगितले होते. मी, पुरंदरमधील गुंजवणीच्या पाण्यासाठी लढा दिला होता, तर माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षांत गुंजवणीचे धरण पूर्ण केले. दोन वर्षे कोर्ट – कचेर्‍या करण्यात वेळ गेला व लार्सन अँड टुब्रो या कंपनीला टेंडरही माझ्या कार्यकाळात दिले.

विद्यमान आमदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत स्वखर्चाने 1200 कोटी रुपयांची गुजंवणी जलवाहिनी करण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले. गुंजवणीचे पाणी अजित पवारांनी बारामतीला पहिल्याच कॅबिनेटमध्ये पळवले. त्यांच्याच शेजारी पुरंदर-हवेलीचे आमदार बसले होते, परंतु ते एकही शब्द बोलले नाहीत. ते फक्त ताई आणि दादा याशिवाय दुसरे काही काम करत नाहीत, असे टीकास्त्र शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांच्यावर सोडले..

या प्रसंगी अतुल मस्के, माणिक निंबाळकर, भूषण ताकवले, हरिभाऊ लोळे, रमेश इंगळे, दत्ता काळे, विजय ढोणे, नीलेश जगताप, नितीन कुंजीर, प्रशांत वांढेकर, सागर मोकाशी, समीर जाधव, साकेत जगताप आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news