पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वस्त धान्य दुकानदारांना दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत धान्य मिळणे अपेक्षित असून, गेल्या काही महिन्यांपासून वेळेत धान्याचा पुरवठा होत नाही. त्याचा परिणाम थेट धान्य वितरणावर होत आहे. जिल्हा पुरवठा आणि अन्नधान्य वितरण कार्यालयातील 77 कर्मचारी व अधिकारी मूळ पदावर म्हणजेच महसूल विभागात वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये धान्य उशिरा मिळेल; परिणामी धान्य वितरण रखडण्याची शक्यता आहे. अन्नधान्य वितरण आणि जिल्हा पुरवठा कार्यालयातील पदांचे नवीन आकृतिबंध तयार करण्यात आले आहे. या दोन्ही विभागांत काम करणारे महसूल विभागातील सुमारे 70 पेक्षा अधिकारी अधिकारी व कर्मचारी बुधवारी (दि. 3) आपल्या मूळ विभागात परतले आहेत.
त्यामुळे दोन्ही कार्यालयांतील कामकाज खोळंबले. अन्नधान्य वितरण विभागातून कर्मचारी कमी झाल्याने आता केवळ 20 अव्वल कारकून, 26 लिपिक व 1 तहसीलदार इतकेच कर्मचारी व अधिकारी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शिल्लक अधिकारी व कर्मचार्यांवर कामाचा ताण येऊन त्याचा परिणाम धान्यपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात स्वस्त धान्यांची 715, तर जिल्ह्यात 1100 हून अधिक दुकाने आहेत. रेशन दुकानांच्या संख्येनुसार पदांचा आकृतिबंध निश्चित केला आहे. त्यात परिमंडल कार्यालय हे एक युनिट गृहीत धरण्यात आले असून, त्यानुसार पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सध्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या मूळ पदावर गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार कर्मचार्यांना मूळ पदावर पाठविण्यात आले आहे. कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहेत. त्यामुळे कामकाजासाठी मनुष्यबळाचे नियोजन केले जात आहे.
– सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे
गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी रेशनवर धान्य वेळेत मिळत नाही. त्याचा थेट परिणाम धान्य वितरणावर होत आहे. ऑगस्ट महिन्याचे धान्य अद्यापही दुकानदारांना मिळालेले नाही.
– गणेश डांगी, अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार महासंघ, पुणे