

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा : करंजे येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्यात पार पडणार्या यात्रेसंदर्भात बुधवारी (दि. 27) आयोजित केलेल्या बैठकीत कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंदिर परिसरातील गाळ्यांचा वादही मिटविण्यात आला.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांच्या ताब्यात गाळे आहेत, त्या संबंधित व्यापारी व पुजारी यांनी दुसरीकडे जागा धरून दुकान टाकू नये, गाळ्यांव्यतिरिक्त मंदिर परिसरात दुकान लावण्यास बंदी राहील, बाहेरील व्यावसायिकांसाठी कमिटीने जागा वाटप करावे, कोणावर अन्याय न होता कोणत्याही वादाशिवाय यात्रा पार पाडावी, तसेच परिसरातील पाच गावांचे सरपंच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहतील आदी निर्णय घेण्यात आले. याशिवाय मंदिरासमोरील दुकानेही हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नेमलेली कमिटी यात्रा नियोजनही पार पाडणार आहे. मंदिरातील पुजार्यांच्या दोन गटांत नुकत्याच झालेल्या वादामुळे संबंधित बैठक बोलाविण्यात आली होती.
देवस्थान ट्रस्टबद्दल काही तक्रारी असतील, तर त्याबाबतीत धर्मदाय कार्यालयाकडे अर्ज करावेत, अशी सूचनाही प्रांताधिकार्यांनी या वेळी केली. कायदा व सुव्यवस्था राखावी, स्वच्छता राखावी तसेच यात्राकाळात कोणी वादविवाद घालण्याचा प्रयत्न केला, तर दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींवर कलम 144 खाली कारवाई करून दोन महिने तडीपार करण्यात येईल.
या वेळी 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, 'सोमेश्वर'चे संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे अधिकारी सोमनाथ लांडे, तलाठी आगम, करंज्याच्या सरपंच जया गायकवाड, करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सर्व विश्वस्त तसेच चौधरवाडी, करंजे, सोरटेवाडी, मगरवाडी, करंजेपुल, सोमेश्वरनगर परिसरातील ग्रामस्थ यांच्यासह बाळासाहेब गायकवाड आणि शिवाजी शेंडकर उपस्थित होते.