उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यासह जिरायती भागातील उंडवडी सुपे, उंडवडी क. प., जराडवाडी, बनवाडी, सोनवडी सुपे, कारखेल, देऊळगाव, खराडेवाडी, साबळेवाडी, गाडीखेल, शिर्सुफळसह आजूबाजूच्या परिसरात सुरुवातीला थोडा फार पाऊस झाला. परंतु, आता पावसाने चांगलीच ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे नजरा लावून बसला आहे.
सुरुवातीला थोडा पाऊस झाल्याने काही शेतकर्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मूग, मका, भुईमूग अशा पिकांच्या पेरण्या केल्या; तर काहींनी मोठा पाऊस होईल, या आशेने पेरण्या केल्या नाहीत. जून महिना संपत आला, तरी मोठा पाऊस न झाल्याने शेतकर्यांनी तूर्तास तरी शेतीच्या मशागती थांबविल्या आहेत. बाजरी, मका यांच्या पेरण्या केल्या. परंतु, पावसाने ओढ दिली. त्यात विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे बीपेरणीचा खर्च वाया जाऊन दुबार पेरण्या कराव्या लागतात की काय, अशी भीती वाटत असल्याचे खराडेवाडी येथील शेतकरी भरत वाबळे यांनी सांगितले.
जराडवाडी येथील शेतकरी श्रीकांत साळुंके म्हणतात की, पुरेशा पावसाअभावी अर्धवट पेरण्या झाल्या असून, बहुतांश शेतकरी पेरणीवाचून राहिला आहे. पावसाने अशीच हुलकावणी दिली, तर खरीप हंगाम वाया जाऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.