पुणे; पुढारी वृत्तसेवा: घरातील शो पीस किंवा हौस म्हणून अनेक जण परंपरेने पोपट पाळत आले आहेत. अशा पोपटपालकांची संख्या मोठी आहे. पोपटाचे 'मिठू मिठू' बोल ऐकत आपल्यापैकी अनेकांचे बालपण गेले असेल. मात्र, आता ही हौस न परवडणारी तर असेलच,
प्रसंगी जेलमध्ये जायला लावणारीही ठरू शकते.
वन्यजीव अधिनियम 1972 नुसार पोपट पाळणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. घरात पक्षी आणि प्राणी पाळण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, पोपट पाळण्याला बंदीच आहे. पोपटांची पिले पकडून त्यांची विक्री करणारे रॅकेटही राज्यात मोठे आहे. या पार्श्वभूमीवर पोपट पाळणे हा गुन्हा असून, त्या विरोधात 50 हजार रुपयांचा दंड आणि एक वर्षाच्या कारावासाची तरतूद वन्यजीव अधिनियम कायद्यात करण्यात आली आहे.
शिकारी झाडाच्या ढोलीतील पोपटाची पिले पळवून त्याचा विक्रीचा व्यवसाय करतात. किमान पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त रकमेला विक्री केली जाते. एकदा पिंजराबंद झालेला पोपट पुन्हा निसर्गात सामावू शकत नाही. त्याच्या पंखातील बळ कमी होऊन वाढ खुंटते. कालांतराने व्याधीग्रस्त होऊन ते मृत्युमुखी पडतात.
पिंजर्यातील पोपटाचे निसर्गातील पोपटापेक्षा आयुष्य कमी असते. निसर्गातला पोपट तीस वर्षांपर्यंत जगू शकतो. पोपट राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे निसर्गाच्या अन्नसाखळीतील स्थान महत्त्वाचे आहे; परंतु त्याची शिकार आणि तस्करी होऊ लागल्यामुळे तो दुर्मीळ बनला आहे. त्यामुळेच वन्यजीव अधिनियम 1972 नुसार वनविभागातर्फे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.