पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे दिसून आले. बारावीच्या परीक्षेत 32.27 टक्के, तर दहावीच्या परीक्षेत 30.47 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले,' अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.2) ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 54 हजार 58 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 53 हजार 547 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी 32.27 टक्के इतकी होती. गेल्यावर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाचा निकाल 6.4 टक्क्यांनी वाढला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 20 हजार 517 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 19 हजार 42 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 803 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 7 हजार 643 विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने एटीकेटी सवलतीसह अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जवळपास 1.33 टक्क्यांनी वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी…
निकालानंतर दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दहावीसाठी (http://verification.mh-ssc.ac.in) आणि बारावीसाठी (http://verification.mh-hsc.ac.in) अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी 3 ते 12 सप्टेंबर व छायाप्रतीसाठी 3 ते 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. मार्च 2022 परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी मार्च 2023 परीक्षा ही अंतिम संधी असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.