वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : पानशेतजवळील आंबी (ता. हवेली) येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. यामुळे पानशेत खोर्यात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे.
आंबी गावाशेजारच्या खासगी जंगलात दत्तात्रय नथू निवंगुणे यांच्या एका शेळीचा सोमवारी (दि. 22) सायंकाळी बिबट्याने फडशा पाडला. या आधी दोन शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला होता. गेल्या आठ -दहा दिवसांपासून आंबीच्या डोंगररानात बिबट्याचा वावर सुरू आहे. हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच मंगल निवंगुणे यांनी केली आहे.
वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, वसंत थोपटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत शेळीचा पंचनामा केला. वनपरिमंडल अधिकारी लटके म्हणाले, 'बिबट्या अथवा हिंस्र वन्यप्राण्याने शेळीचा फडशा पाडला आहे. एका मृत शेळीचे काही अवशेष सापडले. इतर दोन शेळ्यांचे अवशेष सापडले नाहीत.' शेतकरी राजू पासलकर म्हणाले,'आंबी, वरपेवाडीच्या रानात बिबट्याचा वावर सुरू आहे. रानात चरणार्या जनावरांवर बिबट्या हल्ला करीत आहे. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.'
चाकण : चाकणजवळील राक्षेवाडी येथे सोमवारी (दि. 22) मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून एका म्हशीच्या पारडाला ठार केले. बिबट्याच्या हल्ल्याने राक्षेवाडी येथील लोकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. वन विभागाच्या अधिकार्यांना स्थानिक नागरिकांनी धारेवर धरत तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली.
सोमवारी (दि. 22) मध्यरात्री बिबट्याने राक्षेवाडी भागात धुमाकूळ घातला. गोठ्यात बिबट्या शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित शेतकर्याने गोठ्याच्या पर्त्यांवर दगडी मारून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने म्हशीचे पारडू ठार केले. मंगळवारी (दि. 23) सकाळी घटनास्थळी आलेल्या वन विभागाच्या अधिकार्यांना स्थानिक शेतकरी आणी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. बिबट्या नागरी वस्तीत धाव घेऊ लागल्याने राक्षेवाडी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.