पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे,पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या तीन फेर्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये केवळ 45 हजार 792 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. 25 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विशेष फेरीत नेमके किती प्रवेश होणार, याकडे महाविद्यालयांसह शिक्षण विभागाचेदेखील लक्ष लागले आहे. यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी महाविद्यालयांमध्ये 1 लाख 9 हजार 790 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 92 हजार 413 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत.
आत्तापर्यंत केंद्रीय पद्धतीने 37 हजार 780 विद्यार्थ्यांनी, तर राखीव कोट्याद्वारे 8 हजार 12 अशा एकूण 45 हजार 792 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. नियमित फेर्यांमध्ये 70 टक्के प्रवेश दर वर्षी होत असतात. यंदा मात्र तीन फेर्या पूर्ण होऊन विशेष फेरी सुरू झाली, तरी निम्मेदेखील प्रवेश होऊ शकले नाहीत. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवेशासाठी आता विशेष फेरी सुरू झाली असून, 25 ते 27 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील.