पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'मी एक भगवद्गीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही, ' असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला आहे. नीलम गोर्हे यांच्या हस्ते पुण्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम झाला. त्या वेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. या वेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 'राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य होईल तेव्हा करावा, कायदा नेमका काय आहे, ते सर्वच न्यायालय सांगत असते.
पण, आम्ही सांगतो तो कायदा अशा पद्धतीने जर कोणाचा आविर्भाव असेल, तर तो फार काळ काही टिकत नाही, हा माझा अनुभव आहे,' असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला. 'धाराशिव, संभाजीनगर हे नामांतर जनमानसात रुजलेले विषय आहेत. याबद्दल अल्पमत-बहुमत याचा विचार करायचा नसतो.
त्यामध्ये जनतेच्या मनाचा विचार करायचा, एवढेच लक्षात ठेवावे,' असेही त्या म्हणाल्या. आपल्यातून जे दुसरीकडे गैरसमजातून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा नदीचा प्रवाह सुरू होईल, अशी प्रतिक्रिया नीलम गोर्हे यांनी पत्रकारांशक्ष बोलताना दिली.