भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. कुशिरे बुद्रुक ते कोंढरे हा रस्ता कुशिरे बुद्रुक येथे तुटल्याने 11 गावांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी दुपारी हा रस्ता खचून तुटला आहे. या वेळी कोणतीही वाहतूक नसल्याने दुर्घटना आणि जीवितहानी टळली. घटनास्थळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व ग्रामपंचायत कुशिरे बुद्रुकचे ग्रामसेवक मंगेश केंगले, सरपंच बाळू भोईर यांनी पाहाणी करून रस्ता वाहातुकीस बंद केला आहे.
सध्या भीमाशंकर, आहुपे, पाटण परिसरात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुंडुब भरून वाहत आहेत. अनेक रस्त्यांंवर पाणी वाहत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही आवघड झाले आहे. कुशिरे ते कोंढरे हा रस्ता पाटण ते आहुपे, असा जोड मध्यवर्ती रस्ता असल्याने तळेघर, फळोदे, पिंपरी, पाटण, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, भोईरवाडी, कोंढरे, तिरपाड, आहुपे या गावांसाठी उपयुक्त होता.
हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांंधकाम विभागाने 7 वर्षांपूर्वी केला होता. रस्त्यावरील अरुंद पुलाचे बांधकाम हे मातीवरच करण्यात आले होते. याला स्थानिक लोकांनी विरोधही केला होता. परंतु, त्यांचे म्हणणे ऐकून न घेत ठेकेदार व अधिकारी यांनी मनमानी करीत काम केले होते.
गतवर्षीही रस्ता खचून एक छोटा पूल तुटला होता. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी लेखी व तोंंडी तक्रार संबंधित विभाग व माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषदेच्या बांंधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडली आहे.
आदिवासी भागातील कुशिरे बुद्रुक येथे रस्ता खचल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. (छाया : अशोक शेंगाळे)