निमगाव दावडी : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी धावत आहे, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून राजगुरुनगर आगारात जीवघेणे खड्डे पडले असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. राजगुरुनगर युवासेनेने सहाय्यक वहातूक अधीक्षक यांना लेखी पत्र देऊन दोन दिवसांत खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
स्थानक परिसरात मोठ मोठे दोन ते तीन फूटाचे खोल खड्डे पडले आहेत . पावसानंतर पाणी साठून प्रवासी, पादचारी व मोटारसायकलस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही व अपघात होतात. साठलेले पाणी बसच्या दणक्याने प्रवाशांच्या अंगावर उडते. दोनच दिवसांपूर्वी अपघात होऊन दोघांना दुखापती झाल्या आहेत. राजगुरुनगर आगार हे पुणे- नाशिक महामार्गावरील मोठे बसस्थानक आहे. उतर महाराष्ट्र व उत्तर पुणे जिल्हा येथून शंभरहून अधिक बसेस ये-जा करत आहेत. तसेच स्थानिक भागातून अनेक बस ये-जा करत आहेत.
खोल खड्ड्यांमुळे अनेक बस खिळखिळ्या होत आहेत. खड्ड्यांतील पाण्यामुळे प्रवाशांना चढ- उतार करता येत नाही. स्थानक परिसरात अवैध वाहनांचा विळखा पडला आहे, याकडेही एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अवैध वाहनांच्या पार्किंगकडे पोलिसांचेही दुर्लक्ष आहे, असे युवासेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्थानकातील खड्डे तत्काळ दुरुस्तीसह अन्य समस्याही सोडवण्याची शहराध्यक्ष संतोष राक्षे, अशोक वाळुंज, कैलास येवले, अजित डोळस, राहुल मलघे आदींनी स्थानक प्रमुखांकडे केली आहे.
राहुल मलघे, वाहतूक स्थानकप्रमुख वसंत आरगडे यांनी वाहतूक सहाय्यक पाटील, वाहतूक नियंत्रणचे दिलीप तापकीर यांच्याकडे निवेदन दिले. राहुल मलघे, संतोष राक्षे, अशोक वाळुंज, कैलास येवले, अजित डोळस, वसंत साने आदी या वेळी उपस्थित होते.