पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत. शेतकर्यांना देय एफआरपीचा थकित आकडा 1 हजार 536 कोटी 19 लाख रुपये असून, एकूण देय रकमेच्या हे प्रमाण 3.16 टक्क्यांइतके आहे. साखर आयुक्तालयाच्या 15 जुलैअखेरच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू होते. उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचे तथा एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्यांना देण्यात आलेले आहेत. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे.
राज्यातील 90 साखर कारखान्यांनी शेतकर्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर 80 ते 99 टक्के रक्कम देणारे 99 कारखाने आहेत. तर 60 ते 79 टक्के रक्कम 7 कारखान्यांनी आणि शून्य ते 59 टक्के रक्कम 4 कारखान्यांनी दिलेली आहे. म्हणजेच अद्यापही 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देणे बाकी आहे. साखर आयुक्तालयाने पाच कारखान्यांवर आरआरसी जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत.