पुणे, पुढारी वृत्तसेवा: पानटपरीतून पाच हजारांची रोकड चोरी करणार्या रिक्षाचालकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. मयूर शशिकांत कदम (वय 23, रा. हडपसर) असे त्याचे नाव आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. पानटपरीचालक लघुशंकेसाठी गेल्यानंतर कदम याने गल्ल्यातून रोकड लंपास केली होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयासमोर ही घटना घडली होती. याबाबत 26 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी (दि.12) त्यांच्या पानटपरीमध्ये बसले होते.
या वेळी आरोपी कदम पानटपरीच्या जवळ उभा होता. काही वेळाने फिर्यादी हे लघुशंकेसाठी टपरीमधून बाहेर पडले. त्या वेळी कदम याने पानटपरीच्या गल्ल्यातील पाच हजारांची रोकड चोरी करून पळ काढला होता. याबाबत समर्थ पोलिस तपास करत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक तपासावरून संशयित आरोपीची ओळख पटविली. दरम्यान, तो मंगळवार पेठ परिसरात रिक्षामध्ये थांबल्याची माहिती अंमलदार शाम सूर्यवंशी यांना मिळली होती.
त्यानुसार पथकाने सापळा रचून कदम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेली रक्कम दारू आणि आखाड पार्टीसाठी खर्च केल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण जाधव, उपनिरीक्षक सुनील रणदिवे, कर्मचारी शाम सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.