पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मुलांना पोषण आहार मिळावा, त्यांचा हजेरीपट टिकून राहावा, यासाठी शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ठरलेल्या 'मेनू'नुसार तांदळापासून बनविलेले विविध पदार्थ दिले जात आहे. त्यामध्ये खिचडी, वाटाणा भात, वरण भात, सांबर भात आदींचा समावेश आहे.
महापालिका व अन्य अनुदानित शाळांमध्ये हा पोषण आहार दिला जात असताना काही खासगी शाळा मात्र हा आहार विद्यार्थ्यांना देण्यास नकार देत आहेत. विद्यार्थ्यांना पूरक व पोषण आहार मिळावा, या उद्देशाने शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेतंर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा आहार देण्यात येत आहे. कोरोनाच्या कालावधीत जवळपास दोन वर्ष 'ऑफलाइन' शाळा बंद होत्या. त्याऐवजी ऑनलाइन शाळा घेण्यात येत होत्या.
सध्या सर्व शाळा 'ऑफलाइन' सुरू आहेत. महापालिकेने 'ऑफलाइन' शाळा सुरू झाल्यापासून म्हणजे 15 मार्चपासून हा पोषण आहार शाळांमध्ये देण्यास सुरुवात केली. खिचडी व तांदळाचे विविध पदार्थ आठवड्याच्या मेनूनुसार देताना विद्यार्थ्यांना शेंगदाणा लाडू, राजगिरा चिक्की, खजुर किंवा खारिक, असा पुरक आहार देण्यात येत आहे. पोषण आहार पुरविण्यासाठी सध्या 3 वर्षाचे कंत्राट दिले आहे. त्याची मुदत जुलैअखेर संपत आहे. 1 ऑगस्टपासून नव्याने त्याचे कंत्राट दिले जाणार आहे.
काही शाळांचा आहाराला नकार
शहरातील 273 शाळांमध्ये हा आहार दिला जातो. त्यामध्ये महापालिका शाळा, शासकीय अनुदानित, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांचा समावेश होतो. काही खासगी शाळा मात्र आमच्या शाळेत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील मुले शिकत आहेत. ते घरुन डबा आणत असल्याने त्यांना आहाराची गरज नसल्याचे कळवितात.
शाळांतील पोषण आहाराचा 'मेनू'
सोमवार – खिचडी
मंगळवार – हरभरा भात किंवा वाटाणा भात
बुधवार – मसाले भात किंवा पुलाव
गुरुवार – वरण भात किंवा सांबर भात
शुक्रवार – हरभरा किंवा वाटाणा भात
शनिवार – मसाला भात किंवा पुलाव