पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : संततधारमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूर परिस्थिती विचारात घेता तेथील रहिवाशांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. तसेच, क्षेत्रीय कार्यालयानिहाय विविध पथके सज्ज करण्यात आली आहेत.
असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.13) सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पालिका यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधित विभागास दिले आहेत. पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या भागात नदीचे पाणी शिरुन धोका उत्पन्न होऊ शकतो अशा भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी पालिकेची पथके काम करीत आहेत.
झाडांच्या फांद्या अथवा वृक्ष रस्त्यावर पडल्यास ते हटविण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार्या यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पालिका भवनात मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून, सर्व कक्ष 24 तास सुरू असणार आहेत. त्या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांना मदत पोहचवली जाणार आहे.