वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत धरण माथ्याखाली पावसाचा जोर गुरुवारी (दि. 14) सकाळपासून कमी झाला असला तरी रायगड जिल्ह्यालगत संततधार सुरूच आहे. त्यामुळे पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरणात 50 टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणही जवळपास 50 टक्के भरले आहे. चार धरणांच्या खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 14.68 टीएमसी म्हणजे 50.53 टक्के साठा झाला होता. गेल्या 24 तासांत टेमघर येथे 132 मिलिमीटर पाऊस पडला.
खडकवासला धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी नदीत 4708 क्युसेक पाणी सोडले जात होते. वरसगाव, पानशेत व टेमघर धरण खोर्यात पावसाचा जोर आहे. बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या 24 तासांत टेमघर येथे 132, पानशेत येथे 128, वरसगाव 129, खडकवासला येथे 54 मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत येथे 25, वरसगाव येथे 21, टेमघर येथे 30 व खडकवासला येथे 5 मिलिमीटर पाऊस पडला.
धरणातील पाणीसाठा
खडकवासला
100 टक्के
वरसगाव
47.37 टक्के
पानशेत
50.14 टक्के
टेमघर
34.86 टक्के