पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पावसाचा जोर कायम असल्याने पवना धरण शुक्रवारी (दि.12) संध्याकाळी सहापर्यंत 98.30 टक्के भरल्याने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. धरणातून 3 हजार 579 क्युसेक पाण्याचा विसर्ग गुरुवारी (दि.11) रात्रीपासून केला जात आहे. त्यामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. आतापर्यंत पवना धरण क्षेत्रात 1 हजार 986 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दहा टीएमसी क्षमतेचे हे धरणातील पाणी साठा शुक्रवारी जवळजवळ 100 टक्क्यांच्या जवळ पोहचला.
दक्षता म्हणून धरणातून विद्युत निर्मिती गृहाद्वारे (हायड्रो पॉवर) 1 हजार 429.30 क्युसेक आणि धरणाच्या सांडव्यातून 2 हजार 149 क्युसेक पाणी सोडले जात आहे. गुरुवारी (दि.11) रात्रीपासून एकूण 3 हजार 579 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागात नदीचे पाणी शिरले. खळखळून वाहणार्या नदीपात्राचे छायाचित्र घेण्यासाठी नागरिकांनी नदीकाठावर गर्दी केली होती. नदीकाठच्या रहिवाशांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा पंधरा ऑगस्टपूर्वीच धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील गावांचा पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 94 टक्के पाणी साठा उपलब्ध होता.