भोर : पुढारी वृत्तसेवा; निरा देवघर, भाटघर धरण भागात दिवसभर पावसाची रिमझिम सुरू झाल्यामुळे भात तरवे तरारले आहेत. धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. भोर तालुक्यात मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरिपातील पेरणीची कामे रखडली होती. शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात असताना शुक्रवार (दि.1) पासून दिवसभर धरण भागासह परिसरात रिमझिम पावसाची सुरुवात झाली. सुखावलेल्या शेतक-यांनी कडधान्य पिकांच्या पेरणीस सुरुवात केली आहे.
निरा देवघर, भाटघर धरण परिसरातील शेतकर्यांनी धूळ वाफेवर टाकलेल्या भात तरव्यांची उगवण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे हे तरवे रिमझिम पावसावर तरारले आहेत. चांगला पाऊस झाला तर येत्या काही दिवसात भात लावणीला सुरुवात होणार असल्याचे वारवंड येथील शेतकरी संदीप धामुनसे यांनी सांगितले. मोटारीच्या पाण्यावर ज्यांनी 15 दिवसांपूर्वी भात बियाणे टाकलेले आहेत, असे तरवे लावणीसाठी आले असून जास्त मुसळधार पावसाची गरज आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसापूर्वी वळवाच्या पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरीप पेरणी संपत आली आहे. पूर्व पट्ट्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रमझिम पावसामुळे धरण भागातील पाणी पातळीत वाढ होत आहे.