जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचे तीर्थक्षेत्र तसेच औद्योगिक क्षेत्र असून, लाखो भाविक व हजारो कामगारांच्या प्रवासासाठी जेजुरी रेल्वे स्टेशनवरून धावणार्या सर्व रेल्वेगाड्या येथे थांबाव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबरोबरच देशातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात.
यात्रा काळात लाखो, तर दररोज हजारो भाविकांची ये जा सुरू असते. येथून कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस, कोल्हापूर अहमदाबाद, गोवा एक्सप्रेस, अजमेर बंगलोर, लोकमान्य हुबळी एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, पुणे कोल्हापूर, दादर पांडेचेरी, निजामाउद्दीन, चंदीगड, यशवंतपूर, दादर म्हैसूर, चंदीगड बंगलोर, जोधपूर मंगलोर, गोरखपूर कोल्हापूर या गाड्या धावत असतात. या सर्व रेल्वे गाड्यांना जेजुरीत थांबा नाही. केवळ मुंबई कोल्हापूर ही कोयना एक्सप्रेस गाडी येथे थांबते.
एक्सप्रेस रेल्वेगाड्या जेजुरीत थांबत नसल्याने भविकांची मोठी गैरसोय होते. जेजुरीत येणार्या भाविकांना पुढच्या स्टेशनला उतरून इतर गाड्यांनी जेजुरीत देवदर्शनासाठी यावे लागते. जेजुरीमध्ये औद्योगिक वसाहत असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्यने कामगार व अधिकारी वर्ग जेजुरीत येत असतात; मात्र या स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबत नसल्याने कामगार वर्गाची मोठी गैरसोय होते. जेजुरी रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबाव्यात, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेजुरी येथे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाअध्यक्ष अजयसिंह सावंत, जेजुरी ब्रिगेडचे उपाध्यक्ष विजय खोमणे यांनी केली आहे.