जुन्नरच्या शेतकर्‍यांना मिळणार 41 लाख रुपयांची भरपाई

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा : गेल्या मे-जूनमध्ये जुन्नर तालुक्यात सेमिनिज या कंपनीच्या कोबी (इंदु) रोपांची लागवड शेतकर्‍यांनी केली होती. मात्र, तालुक्यातील 39 शेतकर्‍यांनी या रोपांबद्दल कृषी विभागाकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. याच्या पाहणीअंती शेतकर्‍यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर आमदार अतुल बेनके यांनी कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, कृषी खात्याचे अधिकारी व सेमिनिज कंपनीचे प्रतिनिधी यांची तातडीची बैठक बोलावली होती.

त्या बैठकीत आमदार बेनके यांनी प्रतिएकरी एक लाखांची नुकसान भरपाई कंपनीने तातडीने द्यावी, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार 60 हजार रुपये प्रतिएकरी इतकी रक्कम येत्या 1 सप्टेंबरपासून बाधित शेतकर्‍यांना देणार असून, उर्वरित 40 हजारांबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे कंपनी प्रतिनिधींनी सांगितले.

दरम्यान, पावसाळी वातावरणात मर होणारी ही रोपे विकणारे नर्सरी चालकही संकटात सापडले होते. त्यांनाही 60 पैसे प्रतिरोप भरपाई मिळणार असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले. नेत्यांनी अशावेळी परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक असते, मात्र काही जण अधिकार्‍यांच्या अंगावर धावून जात असल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते, अशी टीका बेनके यांनी विरोधकांवर केली.
जुन्नर येथे झालेल्या या बैठकीत कृषी विज्ञान केंद्राचे अनिलतात्या मेहेर, नायब तहसीलदार सचिन मुंढे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, नर्सरी असोसिएशनचे राजेश गावडे पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news