पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'देशातील जल, जीवन आणि जमीन ही महत्त्वाची असून जमिनी खराब झाल्या तर अमाप लोकसंख्येला अन्नधान्य कुठून पुरविणार? ही भविष्यातील धोक्याची घंटा असल्याचे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे-निंबाळकर यांनी येथे व्यक्त केले. कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले तरी जुनी बी-बियाणे जतन करणे आवश्यक आहे. या कामी बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केलेले काम निश्चितच अभिमानास्पद असल्याचेही ते म्हणाले. येथील कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन माजी विद्यार्थ्यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) शिरनामे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी. के. जगताप, संघटनेचे उपाध्यक्ष आणि राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर यांच्यासह पुरस्कार विजेते आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे-निंबाळकर यांना 'कृषी जीवन गौरव पुरस्कारा'ने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते, तर कृषी सन्मान पुरस्कार हा आमदार अरुण लाड (कुंडल-सांगली), अॅग्रो टेक्नॉलॉजीचे संस्थापक-अध्यक्ष व मुख्य सल्लागार प्रा. डॉ. व्ही.एस. बावस्कर (पुणे), गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके (कोल्हापूर) आणि कृषी शिक्षणतज्ज्ञ बी. डी. पवार (इस्लामपूर-सांगली) यांना सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अध्यक्ष पदावरून बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, 'कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या इमारत उभारणीचा प्रश्न आपण सांघिकपणे सोडवू. साखर उत्पादनात ब्राझीलच्या पुढे भारत पोहोचला असून, आपल्याकडे साखर उद्योगात तज्ज्ञ माणसांची आजही गरज आहे. कारण शेतीमध्ये तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. जीवनात कितीही यश मिळाले तरी, आई, वडील आणि देशाला विसरू नका, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के, तर आभार प्रा. डॉ. जनार्दन कदम यांनी मानले.
काय झाडी, काय कॉलेज नि हशा…
कृषी महाविद्यालयातील बहुतांशी माजी विद्यार्थी अनेक वर्षांनंतर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना माजी विद्यार्थी आणि गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कॉलेजचे त्यावेळचे नैसर्गिक वातावरण नमूद केले. काय झाडी… काय कॉलेज…. असा उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट आणि एकच हशा पिकला.