सासवड : पुढारी वृत्तसेवा
पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी ग्रामपंचायतीच्या पाठोपाठ खळद ग्रामपंचायतीनेही विशेष ग्रामसभेत गावातील विधवा प्रथा, परंपरा बंद करीत विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याबाबत खळद ग्रामपंचायतीची 30 मे रोजी मासिक सभा पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे यांनी हा ठराव मांडला.
त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन देऊन सभेमध्ये हा ठराव संमत करत याबाबत तत्काळ विशेष ग्रामसभा घेऊन हा ठराव लोकांसमोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी (दि. 3) उपसरपंच आशा रासकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. या वेळी सदस्य दशरथ कादबाने, शारदा कामथे, नम—ता कादबाने, संदीप यादव, आरती आबनावे, तसेच सुरेश रासकर, रवींद्र फुले, जयराम ईभाड, अंकुश कामथे यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. ग्रामसेवक सुरेश जगताप यांनी सभेत हा ठराव मांडला. याचे सर्व महिलांनी जोरदार स्वागत करत हात उंचावून या ठरावाला संमती दिली. उपस्थित विधवा महिलांनी या ठरावाचे स्वागत केले.