खडकवासला : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत 28.22 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत 28.22 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पावसाचा जोर ओसरला असला तरी पानशेत, वरसगाव, मुठा भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने शंभर टक्के भरलेल्या पानशेत व खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजेपर्यंत वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणात 98.19 टक्के साठा झाला होता. धरण जवळपास शंभर टक्के भरल्याने धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. खडकवासला धरण साखळीची शंभर टक्क्याकडे वाटचाल सुरू असून, साखळीत 28.22 टीएमसी म्हणजे 96.82 टक्के साठा झाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळपासून टप्प्याटप्प्याने पानशेत व खडकवासलाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

सध्या पानशेतमधून 5 हजार 408 तर खडकवासलातून 13 हजार 981 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुठा नदी पात्रातील विसर्ग कमी केला आहे. मात्र, पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी (दि. 12) सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 45, वरसगाव येथे 18, पानशेत येथे 15 व खडकवासला येथे 1 मिलीमीटर पाऊस पडला, तर गुरुवारी (दि. 11) सकाळी सहा ते आज सकाळी सहापर्यंतच्या 24 तासांत खडकवासला येथे 4 , पानशेत येथे 87, वरसगाव येथे 89 व टेमघरयेथे 120 मिलीमीटर पाऊस पडला. पाणीसाठा : खडकवासला शंभर टक्के, पानशेत 99.27 टक्के, वरसगाव 98.19 टक्के व टेमघर 83.36 टक्के.

रबरी आवरण निघाल्याने 25 क्युसेकने पाणी बाहेर
वरसगाव धरण जवळपास शंभर टक्के भरल्याने धरणाच्या सांडव्याच्या एका गेटमधून पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. जोरदार वार्‍यामुळे पाण्याच्या लाटा आदळून गेटमधून पाणी वाहत आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, 'एका गेटचे रबरी आवरण निघाल्याने तेथून पाणी पडत आहे. केवळ 25 क्युसेक पाणी येथून जात आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर गेटची दुरुस्ती केली जाणार आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर सांडव्यातून विसर्ग सुरू केला जाणार आहे.'

'खडकवासला'च्या तीनपट पाणी उजनीत
यंदा एक महिना उशिरा पाऊस सुरू होऊनही धरणक्षेत्रात 1 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत आठ दहा दिवसांचा अपवाद वगळता मुसळधार
पाऊस कोसळला. त्यामुळे खडकवासलातून तब्बल सहा टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी इतकी आहे. खडकवासलाच्या तीनपट क्षमतेचे जादा पाणी आतापर्यंत सोडण्यात आले आहे. त्यातील 4.49 टीएमसी पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे. उर्वरीत जादा पाणी मुठा कालव्यातून सोडण्यात आले, त्याचा लाभ जिल्ह्यातील शेती व रहिवाशांना
झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news