

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: धरणक्षेत्रात शनिवारी दिवसभर सुरू असलेली रिमझिम आणि अधूनमधून पडणार्या जोराच्या सरी यामुळे चारही धरणांत चांगली भर पडली आहे. शनिवारी (16) सायंकाळपर्यंत 17.17 टीएमसी म्हणजे 58.89 टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या 24 तासांत साखळीत सव्वा टीएमसी पाण्याची वाढ झाली.
खडकवासलातील पाण्याची आवक कमी झाल्याने मुठा नदीतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. सायंकाळी सहापासून मुठा नदीत 2,996 क्युसेक विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.
दिवसभर रिमझिम सायंकाळनंतर मुसळधार :
गेल्या दोन दिवसांपासून पानशेत, वरसगाव धरण खोर्यात दिवसभर रिमझिम आणि सायंकाळनंतर मुसळधार पाऊस पडत आहे, असे चित्र आहे. शनिवारी दिवसभरात टेमघर येथे 43, पानशेत येथे 34 व वरसगाव येथे 29 मिलिमीटर पाऊस पडला.
खडकवासला भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. खडकवासला येथे दिवसभरात फक्त 6 मिलिमीटर पाऊस पडला.